मुंबई : आपापल्या भूमिकेवर ठाम रहात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांवर हल्ले चढवण्यात मश्गुल असल्याने राज्यातील सरकार स्थापनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आठवडाभरात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले होते. यावर भाजपाने राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा लोकशाहीचा अपमान आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, सरकार स्थापनेसाठी विलंब होणं ही काही मोठी बाब नाही. मात्र अशात सत्ताधारी पक्षाचे मंत्री राष्ट्रपती राजवटीचा इशारा देत आहेत याला काय अर्थ आहे? भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, युतीत कोणतीही चर्चा झाली नाही. युतीच्या चर्चेच्या बातम्या खोट्या आहेत. कोणी शपथविधीचा मुहूर्त काढत असेल तर तो मुहूर्त महत्त्वाचा नाही. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena on his meeting with Nationalist Congress Party (NCP) Chief, Sharad Pawar: The kind of situation that is prevailing in Maharashtra, all political parties are talking to each other, except Shiv Sena & BJP. #MaharashtraAssemblyPolls https://t.co/rFZPxyEWIS
— ANI (@ANI) November 2, 2019
दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. भाजप निम्म्या काळासाठी मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाही तर सेना निम्म्यानिम्म्याच्या मुद्यावर अडून बसली आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल येवून आठवडा उलटल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार स्थापन होवू शकले नाही. मुळात, शिवसेना आता भाजपने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या वागणुकीचा हिशेब बरोबर करण्याच्या विचारात आहे. भाजपला फिफ्टीफिफ्टी फॉर्मुला मान्य नसेल तर सेना राकॉंसोबत सरकार बनविण्याची तयारी करीत आहे. यात कॉंग्रेसची सोबत मिळाली तर भाजपला पाच वर्षांपर्यंत सत्तेपासून लांब ठेवता येईल.