मुंबई – गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्हांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. कांदा, गहू, फळबागा आणि भाजीपाल्यांची पिकं जमीनदोस्त झाली असून त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.
हिमालयासह उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असून त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.
प्रतितास 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यांचा वेग राहणार असून विजांचा कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, पालधर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.
सर्दी-खोकला साथी वाढल्या –
उन्हाळा सुरू झाल्यानंतर मार्च एप्रिल आणि मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडत असते. परंतु यंदाच्या हंगामात मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही वातावरणातील उष्णता वाढलेली नाही. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे दिवसभरात वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकला तसेच अन्य साथीच्या आजारांत मोठी वाढ झाली असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.