शिराळा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, वारणा धरण परिसरातही अतिवृष्टी होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, येत्या 24 तासात धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणानुसार 2000 ते 5000 क्युसेक्स इतका असणार आहे. सदरचा विसर्ग दिनांक 6/8/2020 रोजी म्हणजेच आजपासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याकामी सर्व स्तरांवर सावधानतेबाबत इशारा देण्यात यावा असे आवाहन टी.एस.धामणकर शाखाधिकारी वारणा पाटबंधारे शाखा वारणावती यांनी केले आहे.