बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सध्या गावांवरुन शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. या प्रकारावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमावाद उफाळून निघाला आहे. दरम्यान, आता शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देण्याची योजना आखली आहे. त्यावरून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चक्क इशारा दिला आहे.ते बेळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची सीमाप्रश्न सोडवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कायदेशीर पथकासह बेळगाव दौरा आयोजित केला आहे. हे दोन्ही मंत्री बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
पण चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या दौऱ्याबाबत बोम्मई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल गोष्ट नाही. बेळगावसंदर्भातील महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली आहे. असं असूनही हे दोन मंत्री बेळगावला भेट देत आहेत. याआधीच आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे पत्र लिहिले आहे.
सध्याच्या परिस्थितीत दोन्ही मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल नाही. त्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी आम्ही त्यांच्याशी आधीच संपर्क साधला आहे. पण तरीही ते बेळगावात आले तर कर्नाटक सरकारची पूर्वीची भूमिका कायम राहील,” असा इशारा बोम्मई यांनी दिला.