नगर – जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभेमध्ये गरमागरम चर्चा झाली. पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावा वरून सुरु झालेली गरमागरमी सभा संपेपर्यंत कायम होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेत विषय समितीच्या सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ही सभा बोलविण्यात आली होती.
या समितीच्या सभेच्या सुरवातीलाच पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेंसाठी एक हजार शाळा खोल्या तीन वर्षात पूर्ण करून देऊ असे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घोषणा केली. त्यावर अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्याला जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आक्षेप घेत म्हणाले की, बांधकाम पूर्ण होऊ द्या आपण त्यांचा सत्कार करू, असे म्हणून ठरावाला विरोध केला. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरवात झाली.
त्यावेळी सचिव वासुदेव सोळंके यांनी विषय सूची वाचण्यास सुरवात केल्यानंतर लगेच परजणे यांनी आक्षेप घेत विषय पत्रिका चुकलेली आहे. सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम प्रथम घेऊन नंतर पदभाराबाबत विषय मांडणे गरजेचा आहे. असे असताना पदभाराचा विषय पहिला कसा घेतला असा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, हर्षदा काकडे यांनी ही प्रशासनाला धारेवर धरले. त्याच वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पहिला विषय निवडणुकीचा पाहिजे होता, त्यानंतर खातेवाटपाचा घेणे गरजेचा होता, असा मुद्दा मांडून प्रशासनाची झालेली चूक कबूल करून दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या वादावर पडदा पडला.
या प्रसंगी विषय समित्या सभापतींना खाते वाटपाचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यावा, असा ठराव जिल्हा परिषद संदेश कार्ले यांनी मांडला. त्याला सर्व पक्षाच्या पक्षप्रतोदांनी अनुमोदन दिल्यानंतर सभेला पुढे सुवात झाली. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींचा व त्यानंतर पंचायत समितीच्या सर्व सभापतींचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्षांचा सत्कार प्रथम प्रशासनाने करणे गरजेचे आहे, असा मुद्दा मांडून प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी प्रशासनाने सत्कार अध्यक्षांचा केल्यानंतर पुढील सत्कार सुरु झाले. भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने जिल्हा परिषदेच्या अधिसपत्याखालील नेवासे तालुक्यातील रस्ते ओलांडून व रस्त्यांच्या कडेने 24 इंची गॅस पाईपलाईन जमिनीतून टाकण्यास परवानगी बाबतचा विषय सभेसमोर आला. त्याला काही सदस्यांनी विरोध करत हा विषय आजच्या सभेत नको, असा सूर उमठल्यानंतर पहिल्यांदाच यावर स्थायीत चर्चा होईल, नंतर तो सर्वसाधारण सभेत मंजुरीला येईल, असे अध्यक्ष घुले यांनी सांगितले.