पंढपुर – विठुरायाच्या भूमीत पाय ठेवला अथवा मंदिराचा कळस दिसला तरी ‘भाग गेला, शीण गेला। अवघा झाला आनंद’ अशी अवस्था दूरदूरहून पायी आलेल्या वारकऱ्यांची झाल्याशिवाय राहत नाही. भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूर येथे पोहोचला. या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज वाखरी येथे मुक्कामी येणार आहेत. बाजीराव विहीर येथे दुपारी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होईल. दरम्यान वारकऱ्यांनी आज सकाळ पासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर, काही वारकरी नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेऊन परत जात आहे.