आळंदी : कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी राज्यभरातून पाच लाखांवर भाविक अलंकापुरीत दाखल झाले होते. रविवारी (दि. 20) कार्तिकी एकादशी झाल्यानंतर द्वादशीला (दि. 21) बहुतांश भाविक सकाळी द्वादशीचे भोजन करून आपापल्या गावी परतले. तर आज (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा झाल्यानंतर लाखो भाविक हे गावी परतले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला गुरुवारी (दि. 17) सुरुवात झाली होती. बुधवार (दि. 23) रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे; मात्र कामानिमित्त जास्त दिवस राहणे अनेक भाविकांना शक्य नसते. त्यामुळे द्वादशी दिवशी निम्मे लोक आळंदीतून परतत असतात. तर संजीवन समाधी सोहळ्यानंतर बहुतांश भाविक गावी परततात. मात्र जे फड परंपरेतील वारकरी आहेत ते अमावस्येचा काला घेऊन परततात.
वारीत ज्येष्ठांची संख्या अधिक
वारीला येणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुले, तरुण, ज्येष्ठ वारकरी असतात. मात्र यावर्षी वारी सोहळ्यात ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. राज्य शासनाने 75 वर्षांवरील व्यक्तींना मोफत एसटी प्रवास केल्याने यावर्षी ज्येष्ठ भाविक वारकऱ्यांची संख्या जास्त होती असा निष्कर्ष काढला जात आहे.