पुणे – ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलयापार केला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल होणार आहे.
हडपसर येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.
दरम्यान,पालखी सोहळ्यामध्ये दिवे घाटात मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांना भोजन-पाणी आणि इतरवस्तू वाटप केल्या जातात. यादरम्यान पालखी प्रस्थानानंतर अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा दिवे घाटात जमा होतो. दिवे घाटाचे सौंदर्य जपावे व हा मार्ग स्वच्छ रहावा यासाठी हा कचरा उचलून घाटाची स्वच्छता करण्यासाठी पुण्यातील काही युवकांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम हाती घेत वाटेतील कचरा जमा करत घाटाची स्वच्छता केली. पुण्यातील “मिसळ कट्टा” ग्रुप तर्फे पालखी मार्गस्थ झाल्यानंतर साफसफाई अभियान राबविण्यात आले.