बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील टेलकडील पाचेगाव, बेलपिंपळगाव हद्दीतील चाऱ्यावरील पिकांचे भरणे शिल्लक असताना पाटबंधारे विभागाने राजकीय दबावापोटी श्रीरामपूर तालुक्यातील चाऱ्याची दरवाजे उघडून पाटपाण्याच्या आवर्तनाचा बट्ट्याबोळ चालविला आहे.
टेल भागातील चाऱ्यांना पाणी न सोडल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा वरील टेलच्या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे. टेलच्या भागातील शेतकऱ्यांनी नेवासा तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही उपयोग झालेला नाही.
सविस्तर असे की, सध्या भंडारदरा धरणामधून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. ओव्हरफ्लोच्या पाण्यातून शेती आवर्तन करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करायला पाहिजे होते. परंतु तसे न करता सगळे ओव्हरफ्लोचे पाणी जायकवाडीला वाहून गेल्यानंतर आठ दिवसांपूर्वी शेती आवर्तन करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. पाटबंधारे विभागाने हा घेतलेला निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असेच म्हणायला हवे.
पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन केले नाही आणि आता पिके जळून चालली असताना नेवासा तालुक्यातील टेलच्या भागातील भरणे शिल्लक ठेवून श्रीरामपूर तालुक्यातील चाऱ्याचे गेट उघडून दिली आहे. सध्याच्या चालू शेती आवर्तनात नेवासा तालुक्यातील 13 नंबर चारीचे जवळपास 60 हेक्टर, 38 नंबर चारीचे जवळपास 40 हेक्टर शेतकऱ्यांचे भरणे अद्याप बाकी आहे.
या प्रकारातून पाटबंधारे विभागाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. या आवर्तनात टेलकडील संपूर्ण शेतीला पाणी न मिळाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता राज्यमार्ग क्रमांक 44 वर रास्तारोको करण्यात येईल असा इशारा शांताराम तुवर, जालिंदर विधाटे, बाळासाहेब पवार, काशीनाथ कुचेकर, बाळासाहेब जाधव, राजगुरू, दगडू शिंगोटे, बाळासाहेब शिंदे, सुधाकर तुवर, संजय जाधव आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.