पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश
वर्धा : आर्वी तालुक्यात नोंदणी केलेल्या 2 हजार 700 शेतकऱ्यांपैकी 1 हजार 300 शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी शिल्लक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी येत्या 4 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
आर्वी तालुक्यातील कापूस खरेदीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज पालकमंत्री यांनी आर्वीतील 4 जिनिग प्रेसिंगला भेट देऊन त्यांना कापूस खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आर्वी तालुक्यात 2 हजार 700 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. एका जिनिंग मिलमध्ये खरेदी सुरू होती. मात्र मनुष्यबळाभावी ती मंदावली. तसेच इतर जिनिंग कापूस खरेदी करण्यासाठी पुढे आल्या नाहीत. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांकडील कापूस शिल्लक आहे.
यासाठी पालकमंत्री केदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन आर्वीतील निरंकार कॉटेक्स जिनिंग, जगदंबा जिनिंग अँड प्रेसिंग, गणेश नॅशनल जिनिंग अँड प्रेसिंग व जय श्री श्याम जिनिंग या 4 जिनिंगला भेट देऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली. पावसाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांकडील कापूस विकला जावा आणि त्यांना खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अडचणीतून मार्ग काढून आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आणि त्यासाठी जिनिंगच्या सहकार्याची आवश्यकता आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री.केदार यांनी यावेळी केले. तसेच शिल्लक कापूस 4 दिवसात खरेदी होईल असे नियोजन करण्यास सांगितले.
जिनिंग मिल मालकांनी सुद्धा त्यांना कापूस खरेदी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याची विनंती केली. यात प्रामुख्याने सरकी व बेल्स ठेवायला जागा कमी पडत असल्यामुळे सीसीआयने सरकी आणि बेल्स लवकर उचलाव्यात. तसेच मजुरांचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे तो बाजार समितीने सोडवावा. याबाबत केदार यांनी सीसीआयचे महाव्यवस्थापक अजयकुमार यांच्याशी चर्चा करून सरकी आणि बेल्स लवकर उचलण्याबाबत सांगितले. तसेच आर्वी बाजार समिती सचिव यांना मजुरांची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले.
यावेळी अमर काळे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी बाजार समिती सचिव कोटेवार आणि जिनिंग व्यवस्थापक उपस्थित होते.