भुलेश्वर -आजपर्यंत कितीतरी वेळा वारकऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्याकरिता वारकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती अर्ज केले आहेत. पण सरकारकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी (दि. 30) पंढरपूर येथे वारकरी सेनेने उपोषण जाहीर केले आहे. या उपोषणास पुरंदर तालुक्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे, याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी श्री भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे संस्थापक अध्यक्ष हभप लक्ष्मण महाराज यादव, सचिव पोपट महाराज वाघले, संत सोपनकाका पालखी सोहळ्याचे चोपदार सिद्धेश महाराज शिंदे व काळदरीचे दिंडीचालक श्रीरंग गायकवाड व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात नमूद केले आहे की, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे वंशज यांच्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, गोकुळ अष्टमीपासून किमान 50 भाविकांना गावच्या मंदिरात भजन व कीर्तन करण्याकरिता नियम व अटी पाळून परवानगी देण्यात यावी, एका वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात कीर्तन परंपरा आणि फडकरी परंपरेचा अपमान करण्यात आला आहे.
त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, असे या निवेदनशात नमूद करण्यात आले आहे.