पुणे -(व्यंकटेश भोळा) करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट घोंगावत असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेवर सोपविण्यात आला आहे. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते “यापेक्षा अधिक काळ शाळा बंद ठेवणे विद्यार्थ्यांचे हिताचे नाही.’ त्याचवेळी वैद्यकीय तज्ज्ञ मात्र “या विषाणूच्या परिणामांची सविस्तर माहिती हाती येईपर्यंत शाळा सुरू करू नयेत,’ अशी मांडणी करत आहेत. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रासह पालकही संभ्रमात आहेत.
शहरातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्गाच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सध्याच्या करोना साथीच्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करावी की नाही, अशा मनस्थितीत शाळा आहेत. याबाबत राज्य शासनाने लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नव्याने फेरआढावा घेत निर्णय जाहीर करणे योग्य राहील, असा विचार पुढे येत आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या लसीकरणसाठी आता केंद्र व राज्य शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
ओमायक्रॉनची लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. पहिली ते सातवीपर्यंत मुलांचा विचार करता राज्य शासनानेच शाळा सुरू करण्यासंदर्भात पुन्हा निर्णय घेणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाकडून जशा सूचना येतात, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमानुसार शाळेकडून सर्व तयारी सुरू असून, ऑनलाइन शिक्षणही योग्य प्रकारे सुरू आहे. मात्र ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणात खूपच फरक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
– अनूमपा गुजराथी, मुख्याध्यापक,
मुक्तांगण पूर्व प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूल
ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली, तरी लस न घेतल्यांना बाधितांची शक्यता जास्त आहे. 18 वर्षांखालील मुलांना अद्याप लसीकरण झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील स्थितीचा विचार करता ओमायक्रॉन हा विषाणू लहान मुलांना लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास लहान मुलांना बाधा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मुलांच्या लसीकरणचा निर्णय झाला. पण त्यादृष्टीने केंद्र सरकारकडून काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.
– डॉ. अविनाश भोंडवे, वैद्यकीय तज्ज्ञ
सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात फेरविचार करणे योग्य राहील. या विषाणूचा संसर्गित होण्याचे प्रमाण विचारात घेणे महत्त्वाचे आहे. शालेय मुलांच्या दृष्टीने ओमायक्रॉन संसर्गित होण्याचे प्रमाण 14 डिसेंबरपूर्वी कसे असेल, त्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय व्हावा. संसर्गितचे प्रमाण आटोक्यात असेल तर शाळा सुरू करण्यास हरकत नाही.
– भगवान पांडेकर, शिक्षक समुपदेशक
शालेय शिक्षण विभागाने टास्क फोर्सशी चर्चा करूनच शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संसर्ग गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून, तो कधी संपेल याची कल्पना नाही. अशा स्थितीत शाळा बंद करणे योग्य होणार नाही. शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे योग्य राहील.
– वसंत काळपांडे,
माजी शिक्षण संचालक तथा शिक्षण तज्ज्ञ
शासन आणि प्रशासनाने अन्य देशांतील स्थिती, भारतातील परिस्थिती, आपल्याकडील रोगप्रतिकारक शक्ती, विद्यार्थ्यांना संसर्ग झालाच तर पुढे काय? अशा प्रश्नांची उत्तरे पालकांना द्यावीत. ओमायक्रॉन परिस्थिती पाहता, आम्ही मुलांना शाळेत पाठवायचे, की नाही? अशा मनस्थितीत आहोत. संसर्गाची भीती असेल, तर
18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
– राधिका इनामदार, पालक