वाई – बॅंकांमधून होणारा करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता बॅंक कर्मचारी तसेच ग्राहकांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी केले आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाई शहरामध्ये नगरपालिकेमार्फत सुरुवातीपासूनच विषाणूचा अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व कार्यवाही करण्यात येत आहे. लॉकडाउन अटी व शर्तीवर काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यापासून नागरिकांची बाजारपेठेत, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच खासगी व सार्वजनिक ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली.
यामुळे करोना प्रादुर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील आठवड्यात वाई शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार व वद्ध महिला कोणताही प्रवासाचा इतिहास नसताना करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे त्यांच्या निकट सहवासातील कुटुंबीयांनाही बाधा झाली.
दि. 1 जुलै रोजी एका बॅंकेच्या वाई शाखेचे कॅशियर आणि दि. 4 जुलै बॅंकेचे इतर 4 कर्मचारी अशा एकूण 5 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. यापूर्वीच्या आठवड्यामध्ये बॅंकेत व्यवहारासाठी आलेल्या वाई शहरातील 1200 आणि लगतच्या ग्रामीण भागातील 450 अशा एकूण 1650 व्यक्ती बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे अतिजोखीम व अल्पजोखमीत आल्या आहेत. या सर्व व्यक्तींना नगरपालिकेमार्फत फोनद्वारे संपर्क करून अथवा प्रत्यक्ष भेट देऊन होम क्वारंटाइन करण्याचे काम सुरु आहे.
बॅंकेतील वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता अत्यंत निकडीचे व्यवहार करावयाचे असतील तरच बॅंकेत जा. शक्यतो बॅंक कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून आपणाला हवी ती माहिती फोनवरुनच घ्या, प्रत्यक्ष शाखेत येणे टाळा. शासनाच्या जनधन योजनेचे पैसे अद्याप नागरिकांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, त्याची विचारणा करण्यासाठी ग्राहकांनी विनाकारण बॅंकेत गर्दी करू नये, वाई शहरातील घोषित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने, बाजारपेठ यांच्यासोबत सर्व बॅक आस्थापनादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांची वाढती गर्दी टाळून शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील सर्वच बॅंकांनी आणि ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाई शहरामध्ये परराज्य व परजिल्ह्यांतून विनापरवाना येणाऱ्या लोकांवर प्रशासनामार्फत कारवाई केली जात आहे. रविवार पेठेत मुंबईहून विनापरवाना आलेल्या पाच लोकांना होम क्वारंटाइन करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.