हैदराबाद – चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती जशी हाताळली गेली आहे त्यावरून भारत कमकुवत नाही. कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला अथवा एकतर्फी केलेल्या कोणत्याही कृतीला भारताकडून सडेतोड उत्तर दिले जाऊ शकते, हेच स्पष्ट झाले आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भारत अणि चीनच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यातून शांततापूर्ण मार्गाने कोणताही तोडगा निष्पन्न झालेला नाही. भारताला शांततेची अपेक्षा आहे. मात्र देशाच्या आत्मसन्मानाला धक्का लावल्याचे कधीही सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले. हैदराबाद मधील दुंडीगल इथल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या दीक्षांत संचालनाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते.
पूर्व लडाख येथे गेल्या सात महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. कोविड-19 च्या आपत्तीदरम्यान भारताच्या वर्तनामध्येच देशाच्या हेतूचे प्रतिबिंब आढळून आले आहे. भारताने अनेक देशांना केलेल्या मदतीबद्दल भारताला अनेक देशांचे पाठबळ मिळाले आहे. या मदतकार्याबद्दल भारताची प्रशंसाही अनेक देशांनी केली आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
देशांतर्गत दहशतवादाबरोबर सीमेपलिकडील समस्याही भारताने प्रभावीपणे हाताळल्या आहेत. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या “एअर स्ट्राईक’मुळे दहशतवादाविरोधातील भारताची ठाम भूमिकाच अधोरेखित झाली. काळाप्रमाणे बदलणारे युद्धतंत्र स्वीकारण्याची गरज आहे. भविष्यात सीमेपलिकडेच आणि समुद्रातच नव्हे तर अंतराळात आणि सायबर विश्वातील आव्हानांनाही तोंड द्यावे लागणार आहे. त्याची तयारीही नव्या पिढीने ठेवायला हवी, अशी अपेक्षाही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.