लखनऊ: मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ आपली खुर्ची वाचवण्यासाठी राज्यात नवीन नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात सुरु असलेल्या निदर्शनातील एका विशिष्ट समुदायावर अन्याय करीत आहेत. आपण एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी म्हटले आहे.
अखिलेश यादव पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोणताही अन्याय होत असेल तर भाजप सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत. 300 आमदार योगींवर रागावले आहेत. यावर योगी घाबरून गेले आहेत आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून अन्याय करीत आहेत. नवीन नागरिकत्व कायद्याविरूद्ध होणाऱ्या हिंसाचाराची चौकशी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या सर्व्हिसिंग जजमार्फत केली गेली तर सत्यता समोर येईल.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय सिव्हिल रजिस्टर (एनआरसी) हे देशातील गरीब आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. एनपीआर पाहिजे कि रोजगार? हा महत्वाचा प्रश्न असल्याचे यादव म्हणाले.