औरंगाबादच्या समर्थनगर शाखेतील धक्कादायक प्रकार उघडकीस ः पोलिसांनी तिघांना केली अटक
औरंगाबाद- औरंगाबादमधील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आहे. तब्बल 58 किलो दागिन्यांवर मॅनेजरनेचा डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. चोरी केलेल्या 58 किलो दागिन्यांची किंमत सुमारे 21 कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे शाखेचा मॅनेजर अंकुर राणे याने शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन या दोघांच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
साडी व्यापारी लोकेश जैन याने मॅनेजर अंकुर राणेला हाताशी धरुन खोटी बिले भरुन ही चोरी करण्यात आली. हा प्रकार सहा महिन्यांपासून चालू होता. या दोघांनी चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या ठिकाणी विकले. वामन हरी पेठे ज्वेलर्स शाखेच्या मालकांनी जेव्हा शाखेची पाहणी केली तेव्हा त्यांना काही दागिन्यांचा ऐवज कमी झालेला आढळला.
त्यांनी ताबडतोब पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा नोंदवत चौकशी सुरु केली. याप्रकरणी मॅनेजर अंकुर राणे, शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि त्याचा भाचा राजेंद्र जैन यांना अटक केली.