कोपरगाव – तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळण्यासाठी नगरपालिकेला पत्र दिले.यामुळेच शहरातील विकासकामांना कुठेतरी खीळ बसणार असून, विकासाचे वावडे कोणाला आहे याचे पाकीटवाल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून विकासावर बोलावे, असा टोला राष्ट्रवादीचे मनोज नरोडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना लगावला आहे.
नरोडे यांनी म्हटले आहे की, सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदारांनी आ. आशुतोष काळे यांना दिलेले मताधिक्य अजूनही माजी आ. स्नेहलता कोल्हे विसरल्या नसून ते त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा विकासाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा व्यक्तिगत पातळीवर टीका करून विकासाचा प्रश्न भरकटविण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोपरगाव भाजपकडून करण्यात आलेला आहे.
न्यायालयात जाऊन शहरातील 28 विकासकामांना मिळविलेली स्थगिती चुकीची असल्याचे जनतेच्या रेट्यामुळे लक्षात आल्यानंतर ती स्थगिती त्यांना उठवावी लागली याचे भान ठेवून पाकीट घेणाऱ्यांनी फक्त पाकिटापुरतेच बोलावे. उगाच व्यक्तिगत पातळीवर टीका करू नये. व्यक्तिगत टीका करणे आम्हालाही जमते. मात्र, आमच्या नेत्याची आम्हाला तशी शिकवण नाही.आम्हालादेखील तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगता येते. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असा इशारा मनोज नरोडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना देऊन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी माजी आ. कोल्हे यांच्या दबावाला बळी पडून नियोजित विकासकामांमध्ये बदल करू नये; अन्यथा आंदोलन केले जाईल, असे मनोज नरोडे यांनी शेवटी म्हटले आहे.