वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या लौकिकात भर : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सोपविली जबाबदारी
कुरवली – शंभर वर्षांपूर्वी वालचंद सेठ यांनी आजच्या मेक इन इंडियाचा विचार ओळखला होता. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर कंपनी स्थापन करून काळानुसार देशाला आवश्यक असणाऱ्या उपकरणाची म्हणजेच सुरुवातीला अवजड उद्योग, साखर उद्योग आणि आता हायटेक इंडस्ट्रीसाठी लागणारे तंत्रज्ञान, मशिनरी व प्रशिक्षित कामगारांच्या साह्याने कंपनीने प्रगती केली. कंपनीने देशाच्या संरक्षण विभागासाठी व चांद्रयान आणि मंगळयान तसेच इस्त्रोच्या मोहिमांमध्ये मोठे योगदान दिले आहे. देशातील पहिली गुजरात येथील अणुभट्टी उभारणीसाठी कंपनीचा मोठा सहभाग आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चांद्रयान-2 मोहिमेसाठी “जीएसव्हीमार्क 3′ या प्रक्षेपणास्त्राचा वापर करण्यात येत असून “चांद्रयान -2′ अवकाशात झेपावताना आवश्यक असणारे बुस्टर वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये बनविले आहेत. चंद्रावर जीवसृष्टी व पाण्याचे अस्तित्व यांचा शोध या मोहिमेद्वारे घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महत्त्वाची जबाबदारी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. चांद्रयान एक मोहिमेबरोबरच मंगळयान मोहीम व एकाचवेळी 100 पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या टप्प्यातील महत्त्वाची बुस्टर प्रणाली वालचंदनगर येथील कंपनीच्या अभियंत्यांनी बनवली आहे. यासाठी आवश्यक पोलाद हैदराबाद येथील मिश्रधातू संस्थेतून मागवले आहे. यावर प्रक्रिया करण्याचे कुशल काम इंडस्ट्रीमध्ये केले. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे “पीएसएलव्ही’ आणि “जीएसएल मार्क-3′ ही प्रक्षेपास्त्र आहेत. यासाठी बुस्टर आवश्यक असते. या बुस्टरमध्ये घन रूपातील इंधन साठवले जाते. याच्या सहाय्याने प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठवले जाते. प्रक्षेपास्त्रला हवेत दिशा देण्यासाठी आवश्यक असणारे “एस 200 फ्लेक्स नॉझल’ कंट्रोल यंत्रणा ही वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या अभियंत्यांनी इस्रो शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केले आहे.
देशाच्या सरक्षंण विभागासाठी वालचंदनगर कंपनीने वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेकदा योगदान दिले आहे. चांद्रयान-2 मध्ये कंपनीने तयार केलेले बुस्टर बसवण्यात आले आहेत. या मोहिमेत कंपनीचा सहभाग असल्याने यांचा वालचंदनगर कंपनी व महाराष्ट्रासाठी अभिमान आणि गौरव आहे.
– जी. के. पिल्लई, व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज.