मुंबई – चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री ८ ते ९च्या सुमारास ही घटना घडली असून यात 16 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सहा मृतदेह सापडले आहेत. याच दुर्घटनेवरून धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की, ‘रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जण बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो!
रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जणं बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो! pic.twitter.com/obucDo0UtA
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 3, 2019
दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती. हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. परिसरातील अन्य गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.