भोपाळ: देशात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एका महिन्यात कोरोना रुग्णाची संख्या ही चक्क २ लाखांच्या पुढे गेल्याचे दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत देशात जवळपास पावणे तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य प्रदेशातल्या शहडोलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता असाच प्रकार भोपाळमध्ये घडला आहे. पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालयाच एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेचे रुग्णालय प्रशासनाने खंडन केले आहे. ऑक्सिजन पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. मात्र त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक अनेक दिवसांपासून करत होते. रुग्णालयातील कर्मचारी या गोष्टीची माहिती देऊन रुग्णांना दाखल करून घेत होते. ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे नसल्याने रात्री उशिरा किंवा सकाळी ऑक्सिजन संपून जातो.
सोमवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी-जास्त होत असतो. मात्र रुग्णांच्या मृत्यूला ऑक्सिजनचा तुटवडा जबाबदार नाही. प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे.