लोणी काळभोर परिसरात सुरक्षेबाबत विदारक स्थिती : संबंधित प्रशासनाची हतबलता
लोणी काळभोर – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध बॅंकाची तब्बल एकवीस एटीएम असून एकाही एटीएमला कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वच एटीएमची सुरक्षा “रामभरोसे’ झाली आहे. हवेली तालुक्यातील विस्तारित आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या लोणी काळभोर परिसरातील एटीएमबाबत संबंधित प्रशासन हतबल असल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या एटीएम मशीनच चोरुन नेण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सर्व एटीएमधारक बॅंकांच्या व्यवस्थापकांची एक बैठक नुकतीच पोलीस ठाण्यात आयोजित केली होती. बैठकीत सुरज बंडगर यांनी सर्व एटीएममध्ये कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, असे आवाहन केले. यावेळी व्यवस्थापकांना सुरक्षारक्षक नेमण्याबाबत लेखी पत्रही देण्यात आले आहे. मात्र, या सर्वच व्यवस्थापकांनी सुरक्षा रक्षक नेमण्यास असमर्थता दर्शवली. त्यांच्या म्हणण्यानुसार एटीएमला सुरक्षारक्षक नेमण्यास आमचे वरिष्ठ कार्यालय परवानगी देत नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीशिवाय आम्ही सुरक्षारक्षक नियुक्त करू शकत नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक बंडगर यांनी सर्व बॅंकाच्या वरिष्ठ कार्यालयाला या संबंधात पत्रे पाठवली आहेत. मात्र, एकाही वरिष्ठ कार्यालयाकडून अजून याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.
सर्व एटीएममध्ये एखाद्या ग्राहकाचे पैसे लुटण्याची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्त ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक यांना एटीएममध्ये व्यवहार करताना कुणाची तरी मदत घ्यावी लागते. मात्र, सुरक्षारक्षक नसल्याने येथे मदत घ्यायची कुणाची हा मोठा प्रश्न आहे. सध्या एटीएममधून पैसे काढताना बऱ्याच नागरिकांची फसवणूक होत आहे. त्याचबरोबरच संपूर्ण एटीएम मशीनच चोरुन नेण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक एटीएमला सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. मात्र, बॅंकाच्या वरिष्ठ कार्यालयातील झारीतील शुक्राचार्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे सामान्य ग्राहकांचे मात्र, हाल होत आहेत.
एटीएम चोरी संदर्भात बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन याबाबतीत सूचना दिल्या आहेत. त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत बॅंकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. बॅंक व्यवस्थापनाने आपले धोरण अमुलाग्र बदलण्याची नितांत गरज आहे.
-सूरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर.