दररोज शंभरावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार; नवीन जागेचा शोध सुरू
पुणे – करोनाबाधित मृतांसह आणि अन्य नैसर्गिक, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठीचे वेटिंग वाढले आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. तसेच नैसर्गिक आणि अपघाती मृत्यूही होत असल्याने बहुतांश स्मशानभूमी चोवीस तास सुरू आहेत. दररोज शंभरच्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे फेरनियोजनाचा विचार करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. या नोंदी तसेच अंत्यसंस्कारासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लागणारा वेळ यामुळे स्मशानभूमीत वेटिंग वाढले आहे.
शहरात 10 विद्युत, 13 गॅस दाहिनी आहेत. एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी सुमारे पाऊण ते एक तास लागतो. यामुळे प्रशासनाने पारंपरिक पद्धतीनेही अंत्यसंस्कार सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची संख्या 145 पर्यंत गेल्याने वैकुंठ स्मशानभूमीतही पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत वैकुंठ वगळता अन्य सात स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनींमध्ये अंत्यसंस्काराला प्राधान्य देण्यात येत होते. परंतु संख्या वाढू लागल्यानंतर पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
…उशीर होण्याचे हेदेखील कारण
ससून रुग्णालयातून दररोज 50 च्या आसपास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात येतात. रात्रीच्यावेळी रुग्ण दगावल्यास अनेक नातेवाईक सकाळी मृतदेह ताब्यात घेण्याची कागदोपत्री कार्यवाही करतात. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आले नाहीत; तर रुग्णालय पोलिसांमार्फत “एमएलसी’ करतात. यामुळेही वेळ लागतो. त्यामुळे बरेचदा एकाचवेळी 10 ते 12 मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठीही विलंब होत आहे.
अंत्यसंस्कारासाठी नव्या जागांचाही शोध
सध्या स्मशानभूमीत अहोरात्र अंत्यसंस्कार सुरू आहेत. दुर्दैवाने यापेक्षा वाईट परिस्थिती येऊ नये. परंतु तशी परिस्थिती ओढवलीच तर नागरी वस्तींपासून बाजूला जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठीही चाचपणी करण्यात येत आहे. करोनाने मृत्यू पावलेल्यांचे सावडणे आणि तत्सम धार्मिक विधी बंद ठेवण्यात करण्याचे नियोजन करण्यात येत असून, सध्या वैकुंठ अथवा अन्य दाहिन्यांमध्ये जशा अस्थी उपलब्ध करून दिल्या जातात; तीच पद्धत पारंपरिक अंत्यसंस्कारांसाठीही वापरण्याबाबत विचार सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृतदेह मिळाल्यानंतर वेळेत शववाहिका तेथे पोहोचेल, यासाठी अंतर्गत वापराचे ऍप सुरू करत आहोत. मृतदेह मिळाल्यानंतर कोणत्या स्मशानभूमीत कमीतकमी वेळेत त्यावर अंत्यसंस्कार होऊ शकतील, याची माहिती रुग्णवाहिका चालक, स्मशानभूमी कर्मचारी तसेच नातेवाइकांनाही देण्यासाठी सेंट्रलाइज यंत्रणा अधिक सुसज्ज करण्याचे प्रयत्न आहेत.
– श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, मनपा