ठोसेघर – सातारा शहराच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील ठोसेघर, चाळकेवाडी परिसरातील छोट्यामोठ्या वाड्या वस्त्यांना सातारा शहराशी जोडणारा बोरणे घाट हा एकमेव मार्ग आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे घाटातील एका वळणावर रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला होता. बांधकाम विभागाकडून तत्परतेने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु या वळणावरवर रस्त्याचे अद्यापही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या तीव्र उताराच्या वळणावर खडीचे ढिगारे पडून आहेत. रस्ताही एका बाजूने ओबडधोबड झाल्याने वाहनचालकांची या वळणावर तारांबळ उडत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे वळण धोकादायक झाले आहे.
ठोसेघर, चाळकेवाडी परिसरात अनेक वाड्यावस्त्या असून त्यांचा सातारा शहराशी जोडणारा सज्जनगड-बोरणे घाट हा एकमेव रस्ता आहे. या घाटात अनेक तीव्र वळणे असल्याने हा घाट कायमच वाहतुकीसाठी धोकादायक समजला जातो. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जुलै महिन्याच्या मध्यावधीत घाटमार्गावरील एका धोकादायक वळणावर रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही दिवस पूर्णपणे ठप्प होती.
काही काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले; परंतु या तीव्र उतार असलेल्या आणि नागमोडी वळणाच्या अरुंद भागावर पावसाळा संपून दोन महिने उलटूनही अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या वळणावर रस्त्याच्या बाजूला पडलेली खडी आणि ओबडधोबड भागामुळे उतारावर वेगाने येणाऱ्या वाहनचालकांची भंबेरी उडत असून छोट्यामोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
सज्जनगड-बोरणे घाटातून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतुकीसाठी धोकादायक असलेल्या या घाटमार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येक जण किरकोळ काही जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा न करता बांधकाम विभागाने या वळणावरील भागाचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी करत आहेत.