शाळांकडून पालकांना प्रवेशाच्या तारखा मिळत नाही : पोर्टलवर अपडेटचा विसर
पुणे – ‘आरटीई’ प्रवेशासाठी शाळांकडून पालकांना तारखा मिळत नाही. यामुळे प्रवेशाच्या “एसएमएस’ची वाट पहात बसण्याची वेळ आली आहे. सहा दिवसांत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची माहितीही अद्याप “आरटीई’ पोर्टलवर अपडेट झालेली नाही.
वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. यासाठी सोयीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू असते. राज्यात 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 446 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाइन अर्ज आले. यासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. यात 1 लाख 926 मुलांना प्रवेशाची लॉटरी लागली. प्रतीक्षा यादीत 75 हजार 465 मुलांचा समावेश आहे.
लॉकडाऊनमुळे “आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले होते. आता 24 जूनपासून पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. लॉटरी लागलेल्यांना प्रवेशाबतचे “एसएमएस’ पाठविण्याचे नियोजन केले आहे. “एसएमएस’मध्ये आलेल्या तारखेला पालकांनी शाळांमध्ये जावून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घेण्याबाबतच्या सूचनाही पोर्टलवर प्रसिद्ध केल्या आहेत.
“एनआयसी’कडे पोर्टल अपडेटची जबाबदारी
प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या वतीने “आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, पोर्टलवर प्रवेशाची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी “एनआयसी’कडे आहे. सध्या पोर्टलवर काहीच माहिती अपडेट केलेली नाही. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक, प्रशासन अधिकारी, अधीक्षक यांच्याकडे आतापर्यंत शाळांमध्ये एकूण झालेले प्रवेश, प्रवेशाच्या तारखा दिलेल्या पालकांची संख्या याबाबत काहीच माहिती उपलब्ध नसते. या अधिकाऱ्यांमार्फत एनआयसीकडे वारंवार माहिती मागितली जाते. मात्र, त्यांना दादच दिली जात नाही, अशी अवस्था आहे.