लोणी धामणी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र वाढतच आहे. एकाच महिन्यात हल्ल्याच्या चार ते पाच घटना घडल्या असून, त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, वासरे मृत्युमुखी पडली आहेत, तर काही जखमी अवस्थेत आहेत. वनविभागाचे अधिकारी येतात, पंचनामा करून जातात.
मात्र, एवढ्या घटना घडल्या तरी बिबट्याला जरेबंद करण्यासाठी अद्याप पिंजरे लावलेले नाहीत. वनविभाग माणसांवर हल्ला होण्याची वाट बघतंय का, असा संतप्त प्रश्न धामणीचे सरपंच सागर जाधव आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे
धामणी धनगरदऱ्यातील बैल, तसेच तीन दिवसांपूर्वी पहाडदरा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यूमुखी पाडल्या आहेत. स्थानिकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून पंचनामा करून घेतला.
मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या पिंजरा लावण्याचा मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा त्याच परिसरात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केला. या घटना ताज्या आहेत. मात्र, मागील पंधरा-वीस दिवसांत धामणी आणि खडकवाडी येथेही बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे,
त्यामुळे सरपंच व ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही वनविभागाने बिबट्याला जरेबंद करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने ग्रामस्थामध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण आहे.बिबट्याने आता मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
घटनास्थळी भेट दिल्या असून, वरिष्ठांशी चर्चा करून बिबट्या जरेबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात येईल.
– अजित शिंदे, अधिकारी, वन परिक्षेत्र मंचर