अपुरे मनुष्यबळ : स्थिती पूर्वपदावर येताना अडचणी
पिंपरी – ‘करोना’मुळे मेटाकुटीला आलेले उद्योग आता पूर्वपदावर येत आहेत. पुन्हा एकदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादने सुरु झाली आहेत. काही दिवसांवर दसरा, दिवाळी आल्याने उद्योगनगरीत सध्या दिलासादायक वातावरण आहे. परंतु उद्योगांना सध्या परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा आहे. करोनामुळे आपल्या गावी गेलेले परप्रांतीय कामगार अद्याप परतलेले नसल्याने पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
करोनामुळे अनेक परप्रांतीय आपपल्या गावी गेले होते. त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मराठी तरुणांना हीच संधी असल्याचे संदेश व्हायरल होत होते. परंतु हे संदेश केवळ मोबाइलवर उरले. प्रत्यक्षात मात्र स्थानिक मराठी तरुण रोजगार घेण्यासाठी पुढे आलाच नाही.
स्थानिक मराठी तरुणांना टर्नर, फिटर व कारखान्यात काम करण्यात रस नसल्याने गेल्या तीन महिन्यांच्या काळात उद्योगांना अपुऱ्या मनुष्यबळाशी झुंजावे लागत आहे. यामुळे उद्योजक आता पुन्हा परप्रांतीय कामगारांना फोन करुन परत बोलवत आहेत. स्थानिक उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच कारखान्यांसमोर फलक लाऊन कामगार हवे असल्याची जाहिरात केली होती. परंतु कुणीही आले नाही, यामुळे आता परप्रांतीय कामगारांशिवाय पर्याय नाही.
परिस्थिती दिलासादायक
गेल्या दीड वर्षापासून मंदी झेलत असलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्राला आता चांगले दिवस दिसत आहेत. पुढे दिवाळी असल्यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्रातील काम वाढले आहे. वाहनांची विक्रीही वाढत असल्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे चांगल्या ऑर्डर आहेत. मोठ्या कालावधीनंतर परिस्थिती सुधारताना दिसत आहे. त्याचप्रमाणे अनेक मोठे प्रकल्पही सुरु झाले असल्याने पायाभूत क्षेत्रातील मशिनरींची मागणीही वाढली आहे. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची मागणी ही वाढत आहे. यामुळे उद्योगनगरीतील हजारो उद्योग धमधमत आहेत. परंतु बदलत्या परिस्थितीचा उपयोग करून घेताना उद्योजकांसमोर कामगारांचा मोठा अभाव दिसून येत आहे.
कधी मिळणार मराठी तरुणांना रोजगार
सध्या सर्वत्र बेरोजगारी या विषयावर मोठी चर्चा होत आहे. परंतु स्थानिक तरुण मात्र कारखान्यात काम करण्यास तयार नसल्याचे परस्पर विरोधी चित्र आहे. ग्रामीण, दुर्गम भागातील तरुणांकडे रोजगार नाहीत. अशा तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन शहरात आणून रोजगार देता येऊ शकतो. सरकारने याबाबत प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी अनेकदा उद्योजकांनी सरकारकडे केली आहे. परंतु याबाबत कोणतही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. महाराष्ट्रातील अनेक भाग असे आहेत, जिथे केवळ रोजगार हमी योजनेवर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. रोजगार हमी योजनेवर किती दिवस हे तरुण काम करणार यांना उद्योगांच्या मुख्य प्रवाहात आणून कुशल कामगार बनविल्यास त्यांचेही उत्पन्न वाढू शकते. यामुळे द्रारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या अनेक कुटुंबाना आधार मिळेल. परंतु सरकार याबाबत कोणत्याही उपाययोजना करत नाही.
उद्योजक प्रशिक्षण देण्यास तयार
शहरात लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार नोकरीसाठी आले. जेव्हा हे कामगार शहरात आले तेव्हा त्यांनाही काहीही माहीत नव्हते. स्थानिक उद्योजकांनी आपल्या कारखान्यातच त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले. महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील तरुणांना शहरात आणल्यास उद्योजक त्यांना स्वतः प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. याबाबत सरकारला कळविले देखील आहे. सरकार आणि उद्योजक मिळून अशी एखादी प्रशिक्षण आणि रोजगार योजना राबवू शकतात.
उद्योजक प्रशिक्षण देण्यास तयार
शहरात लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार नोकरीसाठी आले. जेव्हा हे कामगार शहरात आले तेव्हा त्यांनाही काहीही माहीत नव्हते. स्थानिक उद्योजकांनी आपल्या कारखान्यातच त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले. महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील तरुणांना शहरात आणल्यास उद्योजक त्यांना स्वतः प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. याबाबत सरकारला कळविले देखील आहे. सरकार आणि उद्योजक मिळून अशी एखादी प्रशिक्षण आणि रोजगार योजना राबवू शकतात.
सध्या कामगारांचा अभाव ही सर्वांत मोठी समस्या उद्योजकांसमोर आहे. अनेक दिवसांनंतर उद्योजकांकडे काम आले आहे, परंतु करण्यासाठी पुरेसे कामगार नाहीत. परप्रांतीय कामगारांची वाट पाहण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील तरुणांना उद्योगनगरीत आणून प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्याविषयी सरकारने विचार करायला हवा. उद्योजक प्रशिक्षण आणि नोकरी दोन्ही देऊ शकतात. परप्रांतीय कामगारांनाही स्थानिक उद्योजकांनीच प्रशिक्षण दिले आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना