तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमा, मांजरा आणि लेंडी अशा दोन महत्त्वाच्या नद्यांनी भौगोलिकदृष्ट्या समृद्ध झालेला हा मतदारसंघ विचित्र रचनेमुळेदेखील ओळखला जातो. मुखेड-देगलुर आणि देगलुर-बिलोली अशा दोन मतदारसंघात या तालुक्याचे विभाजन झाले आहे. त्यामुळे विकासाच्या नावाने आनंदच आहे. येथील आमदार गेल्या काही वर्षांत सातत्याने बदलत आले आहेत. त्यामुळे कदाचित विकासाची गंगा येथे भाषणांपुरतीच राहिली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघ. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे फक्त 8 हजार 648 मतांनी विजयी झाले होते. कॉंग्रेसचे उमेदवार आणि 2009मध्ये शासकीय नोकरी सोडून आमदार झालेले रावसाहेब अंतापूरकर यांचा साबणे यांनी पराभव केला. तर, यापूर्वी साबणे हे शेजारच्या मुखेड मतदारसंघातून आमदार झाले होते. तालुक्यातून दोन मोठ्या नद्या वाहत असताना सिंचनाचे प्रमाण येथे अत्यल्प आहे. फक्त नदीकाठच्या गावांतील शेती सिंचनाखाली आहे. नव्याने जलप्रकल्प या दोन्ही तालुक्यात निर्माण झालेच नाही.
एमआयडीसी क्षेत्र नावालाच आहे, कारण, उद्योग नसल्यामुळे येथील तरुणांना हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नाही. या तालुक्यातील नदी पात्रांत लाल रंगाची वाळू आहे. तिला आंध्र आणि कर्नाटकमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे वाळू माफिया गब्बर तर झालेच आहेत, पण पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय सततच्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. पण, एकूणच रस्ते विकासाची बोंब असून वाळू तस्करांची दहशत या भागात आहे. सीमावर्ती भाग असूनही दळणवळण सुविधा फारशी प्रगतशील नाही.
युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष आहे. कॉंग्रेसकडून यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतारपूरकर, वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजय वरवंटकर, गृह खात्यातून निवृत्त झालेले भि. ना. गायकवाड हे तिघे जण उत्सुक आहेत. तर, भाजपने 2014 मध्ये येथून पुणेस्थित उद्योजक भीमराव क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती, पण ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
स्थानिक पातळीवरच्या राजकारणाने त्यांना वेळेवर धोका दिला. त्यामुळे यावेळीही क्षीरसागर हे पुन्हा इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केलीय. तर, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मारोती वाडेकर यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. पण, युती आणि आघाडीच्या समीकरणांवर येथील गणिते जुळून येणार आहेत.
यंदाच्या लोकसभेला देगलूरमधून भाजपला 23 हजार मतांची आघाडी मिळाली होती. पण, ही आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत टिकेल का, हा खरा प्रश्न आहे, त्यावरच विद्यमान आमदाराचे भवितव्य अवलंबून आहे. तर, बहुजातिय मतदार या दोन्ही तालुक्यांत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमसाठी हा मतदारसंघ पोषक आहे.