– तुषार रंधवे
पुणे – करोना संसर्गामुळे समाजाकडून झालेली हेळसांड, उपचारांसाठी रुग्णालयात रांगेत थांबण्याची परवड आणि मृत्यूनंतरही सोपस्कार म्हणून घाईघाईने विद्युत वाहिनीत अंत्यसंसस्कार झाल्यानंतर आता या मृतांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी किमान चार महिने ताटकळत थांबावे लागणार आहे. शास्त्रानुसार व्यक्तीच्या निधनानंतर काही दिवसांच्या अंतराने केलेला विधी म्हणजेचे आंतरिक विधी होय. लॉकडाऊन संपल्यानंतर हा विधी करण्याचा पर्याय “गुरुजी ऑन डिमांड’ संस्था पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान याच्या ऑनलाइन जाहिराती सुरू झाल्याने त्याबाबत पुरागामी विचारसरणीच्या लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
कोणत्याही कारणामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळविण्यासाठी हिंदूधर्म पद्धतीमध्ये धार्मिक विधी सांगितले आहेत. या व्यक्तीच्या जीवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे, असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो, अशी इच्छा त्या मृत जीवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते. त्यानुसार पुणे शहरातील विविध घाटांवर हे विधी केले जातात. करोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर शासकीय नियमावलीनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात हा मृतदेह येऊ न देण्याची खबरदारी घेत थेट विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केला जातो. मात्र, त्यामुळे मृताच्या आत्म्याच्या शांतीकरिता दहाव्या, बाराव्या अथवा चौदाव्या दिवसाच्या विधीकरिता आवश्यक असलेल्या अस्थी व जीवखडा (अंत्यसंस्कारादरम्यान मडके फोडण्यासाठी वापरलेला दगड) या दोन्ही वस्तू उपलब्ध होत नाही.
धर्मशास्त्राप्रमाणे या दोन्ही गोष्टी मृताच्या आत्म्याच्या शांतीकरिता केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीकरिता आवश्यक आहेत. त्यामुळे आतापर्यंत पुणे शहरात करोनाबाधित होऊन मरण पावलेल्या व्यक्तींचा दहावा व अन्य धार्मिक विधीच होऊ शकला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर शहरातील विविध घटांवर आंतरिक विधी करण्यासाठी मृतांचे नातेवाईक गर्दी करण्याची शक्यता आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ठरावीक कालावधीत धर्मशास्त्रात सुचविलेले धार्मिक विधी होऊ न शकल्यास, त्या आत्म्याच्या शांतीसाठी काही दिवसांच्या अंतराने हे विधी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे धार्मिक विधी करताना मृताच्या अस्थी व जीवखडा उपलब्ध असल्याचे प्रमाण मानले जाते. अशाप्रकारे हा आंतरिक विधी केला जातो. करोनाबाधित मृतांच्या आत्म्याच्या शांतीकरिता हा पर्याय गुरुजी ऑन डिमांडने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार लॉकडाऊन संपल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना हा विधी करता येणे शक्य होणार आहे.
– अक्षय चावरे, गुरुजी ऑन डिमांड संस्था