राजगुरूनगर – राजगुरूनगर आगाराच्या एसटी बस सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची गैरसोय सुरू झाली आहे. “वाट पाहीन पण एसटीने जाईल’ ही म्हण ग्रामीण भागात आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे. अगोदर करोना आणि त्यानंतर कर्मचारी संप यामुळे गेली काही दिवसांपासून एसटी सेवा थांबली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते आता ग्रामीण भागातील गावागावांमध्ये पुन्हा एसटीची सेवा सुरु झाल्याने अच्छे दिन आले आहेत.
राजगुरूनगर आगारातून धावणाऱ्या बसेसला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. लांब पल्ल्याच्या बसेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे तर तालुक्यात ग्रामीण भागातील काही मार्गावर प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तर दुसरीकडे शासकीय सुट्या आणि लग्नसराई असल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई नाशिक पुणे सोलापूर, औरंगाबाद आदी बसेसला जादा उत्पन्न मिळत आहे. गेली काही दिवसानंतर राजगुरूनगर आगार प्रवाशांनी गजबजले आहे. आगार व्यवस्थापक शिवकन्या थोरात, आगार प्रमुख वसंत अरगडे, वाहतूक नियंत्रक दिलीप तापकीर आदींसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या एसटीसेवेचे नियोजन केले जात आहे.
एसटीवर परिणाम नाही
खेड तालुक्यात प्रवाशांची संख्या वाढल्याने पीएमपीएमएलने सुरू केलेल्या बसचा एसटीवर काहीसा परिणाम झाला नाही. काही ठरविक ठिकाणी पीएमपीएमएलची बस सेवा सुरू आहे, त्यामुळे एसटी बस पूरक ठरली आहे. एसटी महामंडळाने तिकिटात कोणतीही वाढ केली नसल्याने प्रवाशांचा कल लालपरीच्या प्रवासाला आहे.
आगारातून येथे सेवा
राजगुरूनगर एसटी बस आगारातून मुंबई, सोलापूर, नाशिक, पुणे, बार्शी, मिरज पैठण, पंढरपूर, औरंगाबाद अक्कलकोट यासह वाडा, भोरगिरी, चिखलगाव, वांद्रा, पाबळ, कवठा, जऊळके वाफगाव, लोणी, आळंदी, चिंचोशी, पाटण, आसाणे, शिक्रापूर, येणिये, साबुर्डी.
आठ कर्मचारी वगळता सर्व पुन्हा रुजू
गेली काही दिवसांपासून उभ्या असलेल्या बसेसची तंत्रज्ञांच्या माध्यमातून तपासणी करूनच बसेस मार्गावर धावत असल्याने बस धावताना अडचणी येत नाहीत. राजगुरुनगर आगारातील संपानंतर 8 आठ कर्मचारी वगळता सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने सर्व मार्गावर बसेस सुरु आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागातील फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.