नगर: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेत स्थापन झाल्यापासून ते सरकार पडणार असल्याच्या रोज चर्चा होताना दिसतात. यातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी थोडे थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा केला आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी कर्जत तालुक्यात आलेले भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर राज्य सरकारच्या योजनांसंबधीच्या तक्रारी आल्या. तो धागा पकडून विखे पाटील म्हणाले की, थोडे थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात विखे यांनी हे विधान केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार यांच्या मतदारसंघात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार असून, त्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात आढावा बैठका घेतल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. सरकारी लसीकरण केंद्राचाही आढावा घेऊन लसीकरणाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ७२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना ५० हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. ती केवळ कागदावरच राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी विविध योजना देशांमध्ये राबवल्या आहेत.
संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नागरिकांसाठी कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. जेथे लसीकरण कमी झाले आहे, तेथे विशेष मोहीम राबवली जाणार असून १५ सप्टेंबरपर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखे झालेले असेल, असे सुजय विखे म्हणाले.