वाई -जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांच्या वेळेत सकाळी 9 ते 2 असा बदल करताच वाई तालुक्यातून करोना नाहीसा झाल्यासारखे लोकं रस्त्यावर उतरत आहेत. लॉकडाऊनची एवढी मोठी धास्ती नागरिकांनी घेतली आहे की रस्त्यावर येण्यासाठी मज्जाव केल्यास काहीही खरेदी करता येणार नाही, आपले हाल होऊ शकतात, या भावनेपोटी सध्या वाई शहरात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रत्येक भागात गर्दी करताना दिसत आहेत. त्यातच वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याने वाहतूक पोलीस लांबूनच पाहत उभे राहत आहेत.
सक्तीची रजा जाहीर केल्यासारखे कोणत्याही चौकात पोलीस दृष्टीस पडत नाहीत. लोकांना अडविणारे कोणीच नसल्याने वाहनचालक मनाला वाट्टेल तशा पद्धतीने गाड्या पार्किंग करून खरेदी करताना दिसत आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने गर्दीकडे दुर्लक्ष न करता बघ्याची भूमिका घेऊ नये, अशीमागणी होत आहे.
शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बंधने टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली. नागरिकांना दिलासा देण्याचा उद्देश होता. परंतु, मोकळीक मिळाल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने कामाच्या निमित्ताने बाहेर पडून मंडई, मार्केट व मुख्य रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत.
त्यामुळे करोना संसर्गाच्या नियमाची “ऐशी की तैसी’ तर होत आहेच.
परंतु, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दररोज दिसत आहे. भाजी मंडई, किसन वीर चौक, महागणपती चौक, ग्रामीण रुग्णालय परिसर, पोस्ट ऑफिस परिसरसह मुख्य रस्त्यांवर नागरिक मोठया प्रमाणावर गर्दीसह वाहतूक कोंडी करीत आहेत. सोशल डिस्टंन्सिगच्या नियमाचे उल्लंघन केल्याने संसर्गाला आमंत्रण दिले जात आहे.
बाजार समितीसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मंडईची वेळ सायंकाळी सहा व सकाळी ठीक पाच वाजता आहे. त्यापूर्वीच शेतकरी व व्यापारी समितीच्या मुख्य गेटवर गर्दी करत आहेत. समितीच्या समोरही मोठ्या प्रमाणात भाजीविक्रेते बसत असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होत आहे. समिती प्रशासनाचे कोणतेही बंधन शेतकरी व व्यापारी पाळत नसल्याचे प्रखरतेने जाणवत आहे. वाई तालुक्यात करोना येणारच नाही अशा आविर्भावात नागरिक वावरत आहेत. ही गंभीर बाब आहे. शहरात व्यापाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण होत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ 28 दिवसांसाठी बंद करण्यात आली. तरीही गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही.