वाघोली – महापालिका वाघोलीतून टॅक्स जमा करीत असताना त्याबदल्यात पुरेसे पाणी वाघोलीकरांना द्यावे, अशी मागणी ‘टीम वाघोली अगेन्स्ट करप्शन’च्या वतीने महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आली. वाघोलीच्या पाणी प्रश्नाबाबत महापालिका पीएमआरडीएच्या सहाय्याने काय निर्णय घेणार याकडे वाघोली करांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाघोलीतील पाणी, रस्त्याच्या प्रश्नांबाबत सोसायटी धारकांच्यावतीने जन आंदोलन नुकतेच पार पडले असताना आंदोलनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार टीम वाघोली अगेन्स्ट करप्शनची पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर व संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न पडली.
बैठकी दरम्यान वाघोलीतील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. वाघोलीतील वाढती लोकसंख्या विचारात घेता वाघोलीकरांना जवळपास ४७ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी सद्यस्तिथीत ५ एमएलडी क्षमतेची योजना चालु आहे. ज्यातून फक्त गावातील घरांना पाणीपुरवठा होत आहे. पीएमआरडीएची अजून एक ५ एमएलडी ची वाढीव पाणी पुरावठा योजना चालु आहे. साधारण पुढील ३ महिन्यात ती योजना पूर्ण होईल व त्यातून काही भागात पाणी दिले जाईल.
तरी देखील अजूनही वाघोलीकरांना ३७ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची गरज आहे. त्याबद्दल बोलतांना अधिकारी म्हणाले की, एका खाजगी कंपनीचा सर्वेक्षण अहवाल आला आहे, त्याचा अभ्यास करून पुढील बजेट मध्ये निधी उपलब्ध करून पाणी प्रकल्प चालु करू, तो प्रकल्प चालु करण्यासाठी किमान ३ ते ४ वर्षे इतका कालावधी जाईल. तोपर्यंत महापालिकेने टँकर ने पाणी पुरवठा करण्यास विनंती नागरिकांनी केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी सिन्टेक्स टॅंक उभा करू आणि त्यात पाणी सोडले जाईल. उरुळी देवाची येथे सध्या असे पाणी दिले जात मात्र या सुविधेलाही २ महिन्यांचा कालावधी लागेल.
“वाघोली सारखे मोठे कर देणारे गाव महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याअगोदर सरकार आणि प्रशासन यांनी येथील प्रश्नांचा अभ्यास करून उपाययोजना करायला हवी होती. पण दोन्ही पातळीवरील निष्काळजीपणामुळे अजून वाघोलीकरांना किती दिवस बिनापाण्याचे राहावे लागेल हा मोठा प्रश्न आहे.” – रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)