वाघोली – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून जलदगती जनता समस्यानिवारण उपक्रम अंतर्गत पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील 21 गावांमधील प्रशासनाकडे प्रलंबित प्रश्न, गावातील सामाजिक प्रश्न व नागरिकांच्या वैयक्तिक समस्या याबाबतचे निवेदन स्वीकारून त्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी सुरू केला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत प्रदीप वसंतराव कंद यांनी सांगितले की शिरूर-हवेली चे लोकप्रिय आमदार अशोक पवार यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला व्हावा व जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने व्हावी यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला. मात्र सध्या covid-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून नागरिकांची कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी व शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन तंतोतंत व्हावे या हेतूने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या हेतूने जलदगती जनता समस्यानिवारण उपक्रम अंतर्गत पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील 21 गावांत कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येतआहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून गावोगावी, वाड्या-वस्त्या वरील भेटी देऊन अनेक प्रलंबित तसेच सध्या नव्याने निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने केलेला आहे. घरोघरी वाड्या-वस्त्या वरील भेटीदरम्यान नागरिकांनी लेखी अथवा तोंडी विविध समस्यांबाबत चे निवेदन द्यावे असे आवाहन कंद यांनी केले आहे.