वाघोली : वाघोली येथील साई सत्यम पार्कच्या गोडावून परिसरातील डेकोरेशनचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग लागून आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या गोडावून मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आशिष सर्जित अग्रवाल (वय ४०, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्या गोडावून मालकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार धनंजय गोंगे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील साई सत्यम परिसरात शुभ सजावट चे साहित्य असलेल्या गोडावून शुक्रवारी (दि. ५) रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली होती. या भीषण आगीमध्ये बिश्वजित सन्यासी सेन, बिजन मिलन पात्र या कामगारांचा जळून मृत्यू झाला होता तर कमल मुकुल बार याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला होता.
तिनही कामगार पच्छिम बंगालचे होते. कामानिमित्त ते गोडावून परिसरातील खोलीत वास्तव्यास होते. गोडावूनचे मालक आशिष अग्रवाल यांनी गोडावूनच्या खोली मध्ये कामगारांना ठेवून सदर बाबत अग्निशमन विभाग, विदयुत विभाग, बांधकाम विभाग, पोलीस विभागाची कोणतीही परवानगी न घेता, गोडावून मधील कामगारांच्या जिवीताच्या रक्षणाकरीता कोणतीही ठोस उपाय योजना न करता, हलगर्जी व निष्काळजीपणा केल्यामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.