१०, ११ व १२ एप्रिल रोजी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय
वाघोली (प्रतिनिधी) : लॉकडाऊन असतानादेखील वाघोलीत सर्वत्र भाजीपाला, किराणा माल, बेकरी, चिकन, मटण आदी साहित्य खरेदी करण्यासाठी वाघोली परिसरातील नागरिक वारंवार रस्त्यावर बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ते सोमवार म्हणजेच दि. १०, ११ व १२ एप्रिल रोजी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय नागरिक व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत घेतला आहे.
करोना व्यवस्थापनाबाबत सर्व उपाययोजना वाघोली परिसरात काटेकोरपणे केल्या जात आहेत. परंतु सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता वाघोली गावामध्ये नागरिकांची खुप ये-जा होत आहे. किराणामाल व भाजीपाला खरेदी करण्याच्या नावाखाली लोक बाहेर पडत आहेत. तसेच सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात नाही. त्यामुळे येथील प्रादुर्भाव कोणत्याही क्षणी वाढू शकतो.
याबाबत कोरोना विषाणुवरील गाव पातळीवरील सनियंत्रण समिती वाघोली यांच्या सभेमधील निर्णयानुसार व वाघोली गावामधील किराणा व भाजीपाला विक्रेते यांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये वाघोलीत शुक्रवार (दि.१०), शनिवार (दि.११), रविवार (दि.१२) रोजी स्वयंस्फूर्तीने गाव पातळीवर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळामध्ये सेवा मेडिकल, दवाखाने, दुध पुरवठा तसेच पशुसेवा व्यवसाय या सुविधा सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन सर्व किराणा दुकाने आणि भाजीपाला व्यवसायिकांसह इतर सर्वांना करण्यात आले आहे.
पाच दिवसापूर्वी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अचानक निर्णय झाल्याने अनेकांची जीवनावश्यक वस्तूंसाठी गैरसोय झाली होती. त्यामुळे सदरचा बंद एक दिवस पाळून पुन्हा सुरु करण्यात आला. यावेळी मात्र नागरिकांना दोन दिवस अगोदर मुदत देऊन स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा योजनेतील ४१३ जणांनाच होणार रेशनिंगचे वाटप
शासनाकडून पहिल्या टप्प्यात वाघोली गावामधील अन्न सुरक्षा योजनेमधील फक्त ४१३ कुटुंबांना रेशनिंगचे वाटप केले जाणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, रेशनिंग दुकानदार ४१३ जणांशी संपर्क साधून सोशल डीस्टन्सिंगद्वारे रेशनिंग देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शासनाकडून येणाऱ्या धान्यातून केसरी रेशनिंग कार्ड धारक व इतरांना रेशनिंग मिळणार आहे.
वाढीव भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई
भाजीपाला विक्री करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीने ठराविक विक्रेत्यांना अनुमती दिली आहे. याव्यतिरिक्त अनेक भाजीपाला विक्रेते भाजी विक्री करीत असून नागरिकांची गर्दी करून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. यामुळे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांवर ग्रामपंचायत कारवाई करणार आहे. तसेच किराणामाल दुकानदारांना देखील सोशल डीस्टन्सिंग, सॅनिटायजर व इतर नियम ठरवून दिले आहेत. सदरचे नियम मोडणार्या किराणा दुकानदारांवर ग्रामपंचायत कारवाई करणार आहे