कोलकाता : करोना लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याने निमलष्करी दलाला निमंत्रित करावे, अशी सूचना करून प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. करोना नाहिसा करण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने केंद्रीय निमलष्करी दलांना पाचारण करावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे हे ट्विट आले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यभर ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी एक हजार 174 मंडई प्रशस्त जागेत हलवल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग सांभाळता येणे शक्य झाले आहे, असे एका वरीष्ठ पोलिस अशिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रोज्यातील 256 मंडईमध्ये अद्याप गर्दी होत असून त्यांना हलवण्यासाठी जागेचा शोध सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मानवतावादी दृष्टीकोन ठेवून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करा, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेकदा सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या नव्या सुचनेवर तृणमूल कॉंग्रेसने टीका केली असून त्यांच्याकडे दूर्लक्ष करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारला अस्वस्थ करण्याखेरीज राज्यपालांना कोणतेही काम नाही. करोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ममता सरकार दृढनिश्चयाने कार्यरत आहे. भाजपाच्या क्षुल्लक कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही, असा टोला पक्षाचे प्रवक्ते स्नेहाशिष चक्रवर्ती यांनी दिला आहे.
——————————