दिलीपराज चव्हाण
सामान्यांची नाराजी; प्रश्न विचारला जातोय इतके वर्षे काय करीत होता?
उंब्रज – जनतेच्या व मतदार संघाच्या विकासासाठी पक्षप्रवेश करतोय, असे नवीन पक्षात प्रवेश करताना विद्यमान व भावी नेते म्हणतायत. नेत्यांच्या या वक्तव्यावर “अरे, मग इतकी वर्षे काय करत होता ?’ असा सवाल व्हॉट्सऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर मतदारराजा विचारु लागला आहे.
कधी नव्हे एवढे पक्ष बदलाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहे. सामान्य मतदाराच्या मतांचा, मनाचा कोणताही विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पक्ष बदलणारे आज बहुतांश ठिकाणी दिसत असून त्याला कार्यकर्त्यांची भावना व जनमताचा रेटा असं गोंडस नाव दिलं जात आहे. यामुळे “कोण खरं, कोण खोटं अन् आपण मात्र मारतोय हेलपाटं’ अशी अवस्था सध्या राजकीय मंडळीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतकी वर्षे तुम्ही गुण्यागोविंदाने होताना तिथे, मग आताच का तुमच्या मतदारसंघावर अन्याय झाला. कार्यकर्ते नाराज झाले. अहो नेते, तुमच्यासाठी सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते हे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले.
एकमेकांना बांधावर अडवू लागले. आता तुमचं या घरात (पक्षात) पटत नाही. म्हणून त्या घरात चाललाय. पण…, अगोदर तुम्हीच त्यांच्याबद्दल, त्यांच्या पक्षाबद्दल काय काय आणि कुठे कुठे बोललाय. हे तुम्ही जरी विसरले असाल (किंवा विसरायचे सोंग घेत असाल) तरी सर्वसामान्य जनता, तुमचे व त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विसरणार का? हा मोठा सवाल आहे. अनेकांच्या पक्षांतराबाबत जाहीर टीका होत आहे. हे आपण रोज वाचतोय, पाहतोय. सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्याने पक्षाचे चिन्ह ओरडून ओरडून मतदारसंघात सांगितले. त्यांच्याच नशिबी आता नवीन चिन्ह पुन्हा लोकांना सांगताना मनातून होणारी घालमेल नेत्यांना कळणार आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
ज्या जनतेला पाच वर्षातून एकदा मतदार राजा असं म्हणतात. त्यांच्याच मतांच्या जोरावर निवडणूक लढवतात अथवा निवडून येतात. त्यांना दाखवलेली खोटी स्वप्ने ही स्वतःच्या स्वार्थासाठी मोडून पक्षाची ध्येयधोरणे सोडून पक्ष बदलण्याची एक फॅशनच आजकाल रूढ होत आहे. वाडवडिल ज्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करून नेता झालेला असतो. त्याचाच मुलगा बापाच्या विरोधात दंड थोपटून इतर पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळविण्यात धन्यता मानतो. स्वार्थासाठी राजकीय पक्ष बदलणारी ही नेतेमंडळी जर पक्षाची होत नसतील तर ती सर्वसामान्य जनतेची काय होणार? त्यांच्या प्रश्नांचे काय होणार? दिलेल्या आश्वासनांचे काय होणार? याची विचारणा सोशल मीडियावर होत आहे.
यह पब्लिक है, सब जानती है
कालपर्यंत आमचाच पक्ष व नेता कसा धुतल्या तांदळासारखा आहे, हे बेंबीच्या देठापासून सांगत सामान्य माणसाच्या मनावर विराजमान झालेले आज याच सामान्य मतदारांच्या मनातून उतरू लागले आहेत. यासाठी वेळीच सावध झाले नाही, तर एक दिवस मागे वळून पाहाल तर एकटेच असाल. तेव्हा स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे नेतेहो सावधान. कार्यकर्त्यांनी सांगितले म्हणून, कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, कार्यकर्त्यांची काम होत नाहीत म्हणून मी हा निर्णय घेतला सांगणाऱ्यांनो किती दिवस या कार्यकर्त्यांच्या नावावर बिल फाडणार. “साहेब, यह पब्लिक है, सब जानती है.’ असा सल्लाही सोशल मीडियावरून दिला जात आहे.