गुजरातमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉंग्रेस, भाजप आणि आपने संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला आहे. आता तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचे मतदान 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यांत होणार असून, प्रचार टिपेला पोहोचला आहे. 182 विधानसभा जागांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. भाजपने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल वॉर रूम सुरू केली, एकूण पन्नास हजार कार्यकर्ते सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. या वॉर रूममध्ये डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असलेले तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या प्रचाराची माहिती असलेली एकूण 100 तरुण-तरुणी आहेत. या टीमकडून भाजपची विकासकामे तसेच भाजपच्या नेत्यांकडून केले जाणारे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे. या व्यतिरिक्त भाजपकडे राज्यात दहा हजार सोशल ग्रुप असून, पन्नास हजार स्वयंसेवक सोशल मीडियावर प्रचाराचे काम करत आहेत. भाजपच्या तुलनेत अन्य दोन पक्ष खूपच कमी पडत आहेत. कारण त्यांच्याकडे निधी, कार्यकर्ते व यंत्रणा तुलनेने कमी आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा प्रत्येक संदेश जनतेपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न केला जात आहे.
अलीकडे भाजप जाहीरनाम्यावर फार भर देत नसून, काही राज्यांत मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे! गुजरातसाठीचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, शेतकऱ्यांना फुकट वीज, मुलींना मोफत शिक्षण, नोकरी यासारख्या आश्वासनांचा भडिमार करण्यात आला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला “अग्रेसर गुजरात संकल्पपत्र 2022′ असे नाव दिले आहे. “आप’ने सर्व मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. भाजपने आमच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स कॉपी काढली आहे अशी टीका आपने केली आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपचारांची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. कॉंग्रेसनेही दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जाईल, असे म्हटले आहे. भाजपने उज्ज्वला योजनेंतर्गत दोन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, तर कॉंग्रेसने गॅस सिलिंडरवर पाचशे रुपयांपर्यंत सबसिडी देऊ असे म्हटले आहे. कॉंग्रेसने शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे, तर आपने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. कॉंग्रेस आणि आपने 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे वचन दिले आहे. मात्र, भाजपने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. भाजपने 20 लाख नव्या नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे, तर कॉंग्रेस आणि आपने दहा लाख नव्या नोकऱ्या निर्माण करू असे म्हटले आहे. कॉंग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचे वचन दिले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे संपूर्ण नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे करत आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे नेते असून, भाजपला आपचे कोणतेही आव्हान नाही, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमितभाईंना हे मान्य नाही, असे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी “आप’ला कमी लेखू नका असे बजावून सांगितले होते. आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रचारमोहिमेचा जंगी शुभारंभ करून मुसंडी मारली होती. राज्यात आपची हवा निर्माण झाली असल्याचे चित्र त्यांनी निर्माण केले. त्यानंतर अमितभाई सावध झाले आणि त्यांनी उमेदवारांच्या निवडीत लक्ष घातले. कोणतेही काम न करणाऱ्या, अकार्यक्षम आमदारांना तिकिटे न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
स्टार प्रचारकांची यादी त्यांनी निश्चित केली. या प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करेल याबाबत योगीजी आणि अमितभाई यांच्यात स्पर्धा आहे. परंतु योगीजींनी राज्यात यश मिळवल्यामुळे त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. गुजरातमध्ये विजय न मिळाल्यास, पक्षातील आपले वजन कमी होईल, हे अमितभाईंना माहिती आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी शिफारस केलेली अनेक नावे बाजूला करून, अमितभाईंनी अतिशय काळजीपूर्वक उमेदवार निवडले आहेत. पाटील यांनी ज्या उमेदवारांची नावे सुचवली होती, त्यांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. पाटील यांच्या या कृतीमुळे अमित शहा प्रचंड संतापले होते. त्यानंतर पाटील यांच्या नावावर फुली मारण्यात आली. सुरतमध्ये कुमार कनानी आणि पूर्णेश मोदी यांचे पाटील यांच्याशी चांगले संबंध नाहीत. तरीदेखील त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली.
अहमदाबादमध्ये सध्याच्या 21 आमदारांपैकी केवळ दोघा जणांना तिकिटे देण्यात आली. निवडणुकीतील बारीक-सारीक गोष्टींकडे अमितभाईंचे लक्ष असते. ते आठवड्यातील तीन दिवस गुजरातमध्ये खर्च करत असून, त्यांच्या फोनमध्ये प्रत्येक मतदारसंघाची बूथपातळीवरची सर्व माहिती संकलित केलेली आहे. प्रत्येक उमेदवारास आपल्या मतदारसंघाची संपूर्ण माहिती असली पाहिजे, हा अमितभाईंचा आग्रह असतो. भाजपला “आप’पासून धोका आहे, यावर भर देऊन अमितभाईंनी निवडणुकीची यंत्रणा सक्रिय केली. गुजरातमध्ये “आप’ नको, अशी भावना जनतेत रुजवली आणि मतदारांना भाजपच्या बाजूने उभे करण्याची खेळी केली. “आप’ला मोठे करून कॉंग्रेसची मते तिकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. शिवाय अमितभाईंनी आपले लाडके, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना प्रचारासाठी आणून, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ते टीकेचा भडीमार करतील, अशी व्यवस्था केली. शिवाय मोदीजींच्या अनेक सभा आयोजित केल्या आणि त्या देखील ज्या ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे अशा ठिकाणी!
अमितभाईंचे निवडणूक एजंट म्हणून अनेक वर्षे काम करणाऱ्या हर्षद पटेल यांना त्यांनी गांधीनगरमधून तिकीट दिले आहे. 2017 साली हर्षदभाईंचे नाव जाहीर करण्यात आले होते, परंतु आयत्यावेळी आनंदीबेन पटेल यांनी त्यांचा पत्ता साफ केला आणि तेव्हाचे विद्यमान उमेदवार अरविंद पटेल यांना तिकीट देण्याची व्यवस्था केली. गेल्या 14 नोव्हेंबर रोजी अमितभाईंनी हर्षद पटेल यांच्या निवडणूक कार्यालयास भेट दिली. 2016साली तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी करण्यात येऊन, अमितभाईंचे निष्ठावंत विजय रूपानी यांची या पदावर निवड झाली. त्यानंतर आनंदीबेन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या, परंतु रूपानी यांची कामगिरी सुमार ठरल्यामुळे भूपेंद्र पटेल यांना त्यांच्या जागी आणण्यात आले. भूपेंद्र हे आनंदीबेन यांच्या गोटातील आहेत. मोदी गुजरातमधून दिल्लीला गेल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री तीन वेळा बदलण्यात आले आणि तरीही “ब्रॅंड मोदी’च्या आधारेच मते मागावी लागत आहेत, अशी एकूण भाजपची अवस्था आहे!