नवी दिल्ली – भाजप त्रिपुराची सत्ता राखेल. तो पक्ष मित्रपक्षासमवेत नागालॅंडची सत्ता मिळवेल. तर, मेघालयात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे भाकीत मतदानोत्तर चाचण्यांनी केले. ते अंदाज खरे ठरल्यास नववर्षातील पहिलाच निवडणूक रणसंग्राम भाजपचा उत्साह, तर विरोधकांची चिंता वाढवणारा ठरेल.
विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपुरात याआधीच मतदान झाले. तर, मेघालय आणि नागालॅंडमध्ये सोमवारी मतदानाची प्रक्रिया झाली. मतदान संपल्यानंतर विविध मतदानोत्तर चाचण्यांनी आपले निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार, काही चाचण्यांनी त्रिपुरामधील 60 पैकी निम्म्यापेक्षा अधिक जागा सत्तारूढ भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या राज्यात डाव्या पक्षांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. मात्र, त्या आघाडीच्या पदरी निराशा येण्याची चिन्हे आहेत.
मेघालयात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज चाचण्यांनी वर्तवला आहे. त्या राज्यात सत्तेवर असणारी नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सर्वांत मोठा पक्ष ठरेल. तो पक्ष एकूण 60 पैकी 24 ते 26 जागा मिळवू शकेल.त्या राज्यात तृणमूल कॉंग्रेस चांगली कामगिरी करून दाखवेल. काही चाचण्यांनी तृणमूलला 14 पर्यंत जागा दाखवल्या आहेत.
नागालॅंडमध्येही विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. त्या राज्यात एनडीपीपी आणि भाजप आघाडी स्पष्ट बहुमत मिळवेल, असे चाचण्यांना वाटते. चाचण्यांच्या निष्कर्षांप्रमाणे घडल्यास ईशान्येकडील राज्यांमधील रणसंग्रामातही कॉंग्रेसच्या पीछेहाटीचे सत्र सुरू राहील. तिन्ही राज्यांचे प्रत्यक्ष निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहेत.