मुंबई – राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला. उद्या शुक्रवार, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.
परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.
दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी आज (गुरुवारी) दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.