नगर – अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे औचित्य साधून अहमदनगर महाविद्यालयामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन केले. या पथनाट्यमध्ये निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे.
विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा.
योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, असे संदेश देण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात रॅली काढून सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर संचालक डॉ.नंदकुमार सोमवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.गायकर, उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्ट्रार ए.वाय.बळीद, एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे व डॉ.मालती येवला यांचे सहाकार्य लाभले.