मागील निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होणार : जगदीश मुळीक
पुणे – वडगावशेरीत गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पाणी, रस्ते, कचरा अशा अनेक समस्या सोडविण्यात यश आल्याचा दावा आमदार जगदीश मुळीक यांनी केला आहे. तर मतदार विकासालाच साथ देऊन मागील निकालाची पुनरावृत्ती करतील, असा दावाही मुळीक यांनी केला आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मुळीक यांनी संवाद साधला. यावेळी उपमहापौर आणि रिपाइंचे नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरूजी, अनिल टिंगरे, ऍड. अविनाश साळवे, संदीप जऱ्हाड, राहुल भंडारे, मारुती सांगळे, नगरसेविका शितल सावंत, फरजाना शेख, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, सुनिता गलांडे, शितल शिंदे, श्वेता चव्हाण आणि श्वेता खोसे-गलांडे आदी उपस्थित होते.मुळीक म्हणाले, म्हणाले केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेच्या निधीतून 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी आणला आहे.
मेट्रो, भामाआसखेड पाणीपुरवठा योजना, चार उड्डाणपूल, लोहगावमधील रुग्णालय अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. भाजप नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये चांगले काम केले आहे. या कामांमुळे लोकसभा निवडणुकीत वडगावशेरीतून लाखापेक्षा जास्त मतदान भाजपला झाले. आताही मतदार भाजपच्या सोबतच राहतील, असा दावा मुळीक यांनी केला.
पदाधिकारी म्हणतात…
आमदार मुळीक यांनी वडगावशेरी मतदार संघात सर्वाधिक विकासनिधी आणला. त्यामुळे वडगावशेरीचा कायापालट होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पाणी, वाहतुक आणि रस्त्याच्या समस्या आमदारांनी सोडवल्या आहेत. यामुळे मतदार पुन्हा संधी देतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.