सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचे लक्ष
प्रचार करण्यासाठी मर्यादा असल्याने उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. परंतु आता निवडणूक आयोगाकडून सोशल मीडियावर देखील कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आले आहे.
नगर – निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते व समर्थकांकडून सोशल मीडियाच “हायजॅक’ करण्यात आला आहे. याचा मनस्ताप मात्र सामान्य नागरिक, मतदारांना सहन करावा लागत आहे.
यंदाची निवडणूक ही डिजिटल निवडणूक ठरली आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडला होता. तसेच महागाई, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींवर भावनिक आवाहन करून निवडणूक लढविली गेली होती. परंतु यावेळी मात्र ना भावनिक आवाहन, ना भ्रष्टाचारावर भाष्य त्यामुळे यंदा फक्त सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हॉट्सऍप, फेसबुक, टीकटॉक, इन्स्टाग्राम, ट्विटर, जी प्लस, यू-ट्युब, टंबलर, स्नॅपचॅट इत्यादी सर्वच साईट्सवरून प्रचार करण्यात येत आहे. फेसबुकवर आपल्या नेत्याचा फोटो वेगवेळ्या कविता घालून तो आपल्या सर्व मित्रांना टॅग करण्यात येत आहे.
तसेच व्हॉट्सऍपवर देखील विविध ग्रुपवर फोटो, व्हिडीओ, ऑडिओ शेअर करण्यात येत आहेत. मात्र व्हॉट्सऍपच्या ग्रुपमध्ये मात्र वेगवेगळ्या पक्षाचे समर्थक असल्याने अनेक ग्रुपमध्ये “शीतयुद्ध’ रंगल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र या कार्यकर्त्यांच्या वादाचा मनस्ताप ग्रुपमधील अन्य सदस्यांसह ग्रुप ऍडमीनला होत असल्याचे चित्र आहे. तसेच फेसबुकचेही आहे. फेसबुक सुरू केले की नुसते नेत्यांचे फोटो, व्हिडीओ, त्यांनी केलेले भाषण यामुळे सारेच त्रस्त झाले आहेत.
तसेच एवढे करुनही न गप्प बसणारे कार्यकर्ते फेसबुकवर अन्य मित्रांना आपापल्या नेत्यांचे फोटो टॅग करीत आहेत. यामुळे नको त्या चर्चेला उधाण आले आहे. टॅग करण्यात आलेल्या फोटोखाली विनाकारण कमेंट्स, लाईक्स इत्यादीमुळे बऱ्याचवेळा वादाचे प्रसंग घडत असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थातच या साऱ्याचा त्रास मात्र टॅग करण्यात आलेल्या व्यक्तीस विनाकारण सहन करावा लागत आहे.