भालेराव : कळंब-चांडोली गटात गाव भेट दौरा
मंचर – विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. विकासकामांचा कुठलाही मुद्दा विरोधकांकडे नसल्याने त्यांना उमेदवार शोधण्यापासून कसरत करावी लागत आहे. वळसे पाटील यांना मत म्हणजे विकासाला मत या शब्दांत आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंत भालेराव यांनी व्यक्त केले.
कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटात समाविष्ट असणाऱ्या कळंब, एकलहरे, विठ्ठलवाडी, नांदूर, टाकेवाडी, महाळुंगे, साकोरे, चास, चांडोली, लौकी, नागापूर, वळती, भराडी, खडकी, रांजणी या विविध गावांचा गाव भेट दौरा आणि मंचर येथे होणाऱ्या गुरुवारी (दि. 3) सभेच्या नियोजन बैठकीत भालेराव बोलत होते.
यावेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, उत्तम थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
मंचर बाजार समितीत गुरुवारी होणाऱ्या सभेचे नियोजन या गाव दौऱ्यात करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सभासद,सभेसाठी प्रत्येक गावातून कार्यकर्ते घेऊन येण्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे. कळंब-चांडोली गटातील प्रत्येक गावातून दिलीप वळसे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देवदत्त निकम, उषा कानडे यांनी केले.
दिलीप वळसे पाटील गुरुवारी (दि. 3) घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या महाविजयी सभेसाठी आंबेगाव, शिरूर तालुक्यातील गावे, वाडी, वस्त्यांयामधून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी भोर यांनी केले.
विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा
गेल्या 30 वर्षांत दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यात केलेली विविध विकास कामे गावातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या कालावधीमध्ये प्रयत्न करावा. तसेच सातव्यांदा दिलीप वळसे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन या गाव भेट दौऱ्यात पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.