कोल्हापूर : मतदान प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी केले.
मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावांची खात्री www.nvsp.inया संकेतस्थळावर भेट देवून किंवा voter app द्वारे करता येईल. मतदान झाल्यानंतर आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला गेले आहे का याची खात्री व्हीव्हीपॅट मशिनद्वारे करता येईल.
जर एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कार्ड, खासदार,आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड अशा कोणतेही एक पर्यायी ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येईल.
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उद्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.