मुंबई: सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन कुठल्याही एका पक्षाचं नाव न घेता ईव्हीएम विरोधात पत्रकार परिषद घेतली. याआधी १२ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये ८४ संघटनांनी एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात पत्रकार परिषदेत घेतली होती. देशातील तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं, हे सिद्ध केलं होतं. बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजे, अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली. यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानात कार्यक्रम घेऊन ईव्हीएम विरोधात आवाज उठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. विद्या चव्हाण यांनी दिली.
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, तसेच ईव्हीएमविरोधात सर्व विरोधकांनी वज्रमूठ आवळली असून २१ ऑगस्ट रोजी ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा काढून मतदारांसाठी एक फॉर्म वितरित केला जाणार आहे. आम्हाला बॅलेट पेपरवर शिक्का मारूनच मत द्यायचंय, असा आग्रह या फॉर्मच्या आधारे मतदार नोंदवतील.
राज्यभर सर्व कार्यकर्ते हे फॉर्म लोकांपर्यंत पोहचवतील. मत कोणालाही करा, पण मतदान बॅलेट पेपरवर शिक्का मारूनच करा, असं आवाहन ते करतील. अशा प्रकारची मागणी सर्व विरोधकांनी आज पत्रकार परिषदेत केल्याचे आ. विद्या चव्हाण यांनी सांगितले.