सणबूर – गेल्या पाच वर्षात युती शासनाच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची केलेली विकासकामे बघूनच तालुक्यातील जनतेने मतदान करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले. गुढे (ता. पाटण) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. डॉ. दिलीपराव चव्हाण, पंजाबराव देसाई, राजेश चव्हाण, आत्माराम पाचपुते उपस्थित होते.
देसाई म्हणाले, पाटणकरांना तालुक्यातील मतदारांनी पोत्याने मते देवून आमदार तसेच राज्याचे बांधकाममंत्री केले. परंतु त्यांनी भूमिपूजनाचे नारळ फोडण्या पलिकडे काहीच केले नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच त्यांना व पुत्र सत्यजितसिंह यांना तालुक्यातील जनतेने नाकारले. या निवडणुकीत देखील मोठ्या फरकाने आपला पराभव होणार असल्याचे लक्षात आल्याने खोटी आश्वासने, खोटी भाषणे, खोट्या जाहिराती करून मतदारांची दिशाभूल करायचे उद्योग सुरू केले आहेत.
या भूलथापांना मतदार आता भीक घालणार नाहीत. गेल्या पाच वर्षांत सत्यजितसिंह पाटणकर वाड्याची पायरी उतरून जनतेत कधीच सामील झाले नाहीत. जनतेच्या सुखदुःखाशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही. तालुक्यात महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या परंतू सत्यजितसिंह पाटणकर यांनी अशा वाईट परिस्थितीत देखील तालुक्यातील जनतेची कधीच विचारपूस केली नाही. त्यामुळे सुगीपुरते ढोलगे वाजवणाऱ्या विरोधकांना कायमचे घरी बसवण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. आभार माजी सरपंच सर्जेराव कदम यांनी मानले.