पुणे – भारत दूर संचार निगमने (बीएसएनएल) सुरू केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला प्रतिसाद मिळाला असून, देशातील 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कंपनीवे संचालक अरविंद वडनेरकर यांनी दिली.
कंपनीच्या पुणे विभागाचा आढावा घेण्यासाठी वडनेरकर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बीएसएनएलने तीन उपाययोजना केल्या आहेत. त्यात स्वेच्छा निवृत्ती योजना ही एक योजना होती. या योजनेत 31 जानेवारी अखेर 50 पेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीमध्ये 70 हजार कर्मचारी राहिले आहेत. त्यातील सुमारे 7 हजार कर्मचारी 58 ते 59 वर्षांचे आहेत. ते देखील लवकरच निवृत्त होणार आहे. त्यामुळे वर्षाला वेतनापोटी दिले जाणारे 7 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. हे पैसे कंपनीच्या आर्थिक वाढीसाठी गुंतवणूक म्हणून वापरता येतील. याशिवाय लवकरच बीएसएनएलच्या मालमत्तांचा सर्व्हे करण्यात येणार असून, उपयुक्त नसलेल्या मालमत्ता विकून अथवा भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत.
संचालक अरविंद वडनेरकर म्हणाले…
बीएसएनएलने मागितलेल्या आर्थिक पॅकेजला केंद्राने मंजुरी दिली आहे.
सुमारे पंधरा हजार कोटी रुपये उर्जितव्यवस्थेसाठी टप्याटप्याने मिळणार
दि. 1 एप्रिलपासून फोर-जी सेवा सुरू करणार
बीएसएनएल विकणार नाही
बीएसएनएल विकण्यात येणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे. दिल्ली येथून या बातम्या पेरल्या गेल्या आहेत, तसे काहीही होणार नाही. उलट केंद्र सरकारने सर्वतोपरी सहकार्य करुन बीएसएनएलला फायद्यात कसे आणले जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या विविध योजना राबवण्यात येत आहेत, ते पाहता येत्या तीन ते चार वर्षांत नक्कीच बीएसएनएलला उर्जितावस्था येईल, असेही अरविंद वडनेरकर म्हणाले.