त्रिवेणी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत
उंब्रज (यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी)- विवेकानंद यांनी स्वत: आपण साधू, संत नाही मात्र मी गरीब आहे व मला गरिबांबद्दल प्रेम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच समाजातील दारिद्य्र, अज्ञान, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा गाळात रुतून बसल्या आहेत. त्या बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आजच्या समाजाला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन थोर विचारवंत व शिक्षणतज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले.
उंब्रज, ता. कराड येथे त्रिवेणी साहित्य संमेलनात ऍड. संभाजीराव मोहिते व प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विवेकानंद या विषयावर अत्यंत परखडपणे आपले मत व्यक्त केले. यावेळी लागीर झालं जी चे लेखक व अभिनेते तेजपाल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दाभोळकर म्हणाले, भारताच्या क्षितिजावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या तिघांचा कार्यकाल दैदिप्यमान होता. विवेकानंद हे समाजवादी असल्याने स्त्री प्रश्नावर सजग होते. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली असेल मात्र ती तुमच्या विचार शक्तीला पटत नसेल तर ती स्विकारू नका असा संदेश विवेकानंद यांनी दिला असल्याचे सांगितले.
डॉ. दाभोळकर यांनी सांगून स्वामी विवेकानंद यांच्या विविध ग्रंथातील तसेच पुस्तकातील पान नंबर सह संदर्भ सांगितल्याने उपस्थित श्रोते वर्ग अचंबित झाले. मात्र विवेकानंद यांची चुकीची मांडणी काही ठिकाणी झाली असल्याने विवेकानंद यांच्या ग्रंथांचा संदर्भ पान नंबर सह द्यावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी परखडपणे उपस्थितांसमोर स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन चा तंत्रज्ञान म्हणून योग्य वापर करावा. मात्र हा वापर करीत असताना आपल्या अवतीभोवती तसेच जगामधील नवनवीन घडामोडीची माहिती घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. दाभोळकर यांनी विवेकानंद यांचे संपूर्ण चरित्र प्रेक्षकांसमोर उलगडले. यामध्ये विवेकानंद यांचे समाजवादी धोरण, विविध धर्म याचबरोबर त्यांनी आपल्या स्वत:च्या जीवनकार्याचा उलगडा केला.
यावेळी लागीर झालं जी चे लेखक व अभिनेते तेजपाल वाघ यांनी आपला समाज धर्मांध झाला असून, समाजाला शाहू, फुले यांचा विसर पडला असल्याची खंत व्यक्त केली. चित्रपट क्षेत्र हे सुद्धा साहित्य असल्याचे सांगून, साहित्य संमेलनातून होणारे संस्कार विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अभिजीत पवार यांनी मानले.