सोलापूर – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामामुळे पंढरपूर आणि परिसरातील अन्य जिल्ह्यांचा विकास अत्यंत वेगाने होण्यास मदत होईल. उद्योग आणि व्यवसायासोबतच धार्मिक पर्यटनसुद्धा वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय भविष्यात पंढरपूरच्या विकासात लोकसहभाग वाढल्यास पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र नक्की बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि 5 राष्ट्रीय महामार्गांचा लोकार्पण सोहळा सोमवारी पंढरपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, व्हि. के. सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होती.
तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिसीच्या माध्यमातून कार्यक्रमास हजेरी लावली.
मोदी म्हणाले, या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पालखीसाठी समर्पित पद पथ तयार केले जाणार आहेत. यामुळे भाविकांना त्रास मुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळण्यास मदत होणार आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी संबंधित असलेल्या पंढरपूर या यात्रेकरूंचा प्रवास सुखकर करण्यासाठी हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते हे विकासाचे द्वार आहे. पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका व उंच झेंडे फडकवणारे मार्ग ठरतील. पालखी मार्ग पंढरपूर व परिसरातील इतर जिल्ह्याच्या विकासाचे मार्ग ठरतील. पंढरपूरची सेवा माझ्यासाठी साक्षात श्री नारायण हरी सेवा आहे. संतांच्या विचाराने देशाला समृद्ध केले आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वारकरी एकमेकांना माऊली या नावाने हाक मारतात. माऊलीचा अर्थ आई, म्हणजेच मातृशक्तीचे हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक वीर दिले. पंढरपूरने मानवतेला केवळ भक्ती नव्हे तर देशभक्तीचासुद्धा मार्ग दाखविला आहे.
विठ्ठलाचे दर्शन हे वारकऱ्यांसाठी एक ध्येय असते. विठूमाउलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटतात. युगे-युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. पालखी मार्गाचे भूमिपूजन करताना मला खूप आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.